स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास - चिंचणी (तालुका: डहाणू, जिल्हा: पालघर) येथील हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा 🇮🇳🇮🇳
१९४२ साली भारताचा स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात आपल्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. या आंदोलनात चिंचणी गावाच्या अनेक शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्या स्वातंत्र्य संग्राममधील हुतात्म्यांच्या बलिदानाची गाथा...
डहाणू तालुक्याचे बंदरपट्टी व जंगल विभाग असे दोन भाग पडतात. रेल्वेच्या पूर्वेला असलेल्या जंगल विभागात आदिवासी लोक राहतात. स्वातंत्र्यपूर्वकाळात या भागातील आदिवासी जनता जमीनदार, ठेकेदार यांच्या भयानक पिळवणूक व दडपशाहीखाली पिचून गेलेली होती. बंदरपट्टीतील सर्वसाधारण जनता थोडीफार शिक्षित व आकलन करण्याची बौद्धिक पातळी असणारी अशी होती. त्या भागात सधन व सुशिक्षित मंडळी देखील होती. शिक्षणाच्या सोयीमुळे तरुण वर्गातही चैतन्य होते. म्हणूनच, डहाणू तालुक्यातील याच भागातील लोकांनी स्वातंत्र्य संग्रामात प्रामुख्याने भाग घेतला. चिंचणीला देखील देशभक्तीची आणि स्वातंत्र्य चळवळीची ज्योत लोकमान्य टिळकांच्या केसरीनेच पेटविली. चिंचणीला डाॅ. हरिभाऊ पुरंदरे हे केसरी मागवीत. त्यांचे उघड वाचन म्हणजे धाडसच होते. म्हणून कै. श्री. पंढरीनाथ दाजीबा जोशी हे त्यांच्याकडून केसरी आणीत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकात गुप्तरित्या सामुदायिक वाचन होत असे. त्याचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर व ब्राह्मण आळीमधील माणसांमध्ये विशेष झाला. श्री. कमळाकर पंढरीनाथ जोशी हे केसरीच्या वाचनामुळे विशेष प्रभावित झाले.
१९३० सालापर्यंत या भागात स्वातंत्र्य चळवळीची फारशी भावना रूजली नव्हती. परंतु महात्मा गांधींच्या दांडी यात्रेच्या कार्यक्रमामुळे व प्रचारामुळे सर्वत्र जागृती निर्माण झाली. श्री. कमळाकर पंढरीनाथ जोशी हे त्यावेळी मुंबई म्युनिसिपालीटी मध्ये नोकरीला होते. गांधीजींच्या दांडीयात्रेच्या कार्यक्रमांच्या बातम्यांनी ते एवढे प्रभावित झाले की घरी न कळविता त्यांनी परस्पर नोकरीचा राजीनामा देऊन ते थेट दांडी सत्याग्रहात सामील झाले. तेथे त्यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली.
१९३० साली चिंचणीचे श्री. कमळाकर जोशी यांना वसईला दारूबंदी पिकेटींगबद्दल शिक्षा झाली. चळवळीचे लोण सर्व तरूणात पसरत होते. तरूणांमध्ये निर्भयता निर्माण होत होती. के. डी. हायस्कूलवर श्री. यज्ञेश्वर देवराव बाबरे यांनी तिरंगा फडकवून तरूणांच्या भावना व्यक्त केल्या. १९३२ साली घाटकोपरला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सभा होती. सरकारने ती बेकायदेशीर ठरवून त्यात सहभागी होणाऱ्यांना अटक केली. त्यात श्री. कमळाकर जोशी यांना सहा महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ४० च्या वैयक्तिक सत्याग्रहात श्री. पंढरीनाथ दाजिबा जोशी यांचे जवळ-जवळ सर्वच कुटुंब सत्याग्रहात सामील होऊन त्यांनी तुरुंगवास पत्करला. या सत्याग्रहात श्री. ह. का. बाणे, श्री. परमानंद हरिभाई मेहता, श्री. रा. ब. तरडे, श्री. कमळाकर जोशी अशा अनेक कार्यकर्त्यांनी कारावास पत्करला.
१९४२ साली झालेल्या चळवळीत या भागात प्रामुख्याने दोन प्रकारचे काम झाले. चिंचणीहून वीस स्वयंसेवकांनी सत्याग्रह करून निरनिराळ्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा पत्कारल्या. त्यात सर्व समाजाचे लोक सामील झाले होते. ९ ऑगस्टला गांधीजींनी "चलेजाव" ची घोषणा केल्यानंतर या भागात चैतन्य संचरले. ११ ऑगस्ट, १९४२ ला तरुण स्वयंसेवकांनी गावातून मिरवणूक काढून सभा घेतली. सभेतील भाषणामुळे तरुण मुलांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. इंग्रजी राज्यकर्त्यांच्या विरूद्ध निषेध व्यक्त करण्याकरिता ही तरुण मंडळी श्री. छोटमकुमार भाणा ह्यांच्या नेतृत्वाखाली चिंचणीच्या पोलीस स्टेशनवर गेली आणि त्यांनी चावडीला आग लावली. ही बातमी पोलिसांकडे जाताच पोलीसांची फौज चिंचणीला दाखल झाली. तालुका मॅजिस्ट्रेटने गावातील प्रतिष्ठित लोकांचा सभा घेऊन गावातील चळवळ्या मंडळींवर दबाव आणायचा प्रयत्न केला. ह्या मंडळींने कानावर हात ठेवले व हे काम कमळाकर जोशी हेच करू शकतील असे सांगून त्यांच्याकडे बोट दाखविले. कारण, त्यावेळी जोशी हे गावांत नव्हतेच. परंतु त्या दिवशी ते परत आले तेव्हा तालुका मॅजिस्ट्रेटनी त्यांना लोकांना आवरण्यास सांगितले. श्री. जोशींनी याचा पुरेपूर फायदा उठविण्याचे ठरवून लोकांची समजूत करण्यासाठी लोकांच्या सभा घेतल्या पाहिजेत. त्यास परवानगी मिळावी अशी विनंती केली. कारण त्यावेळी सभा भरविण्यावर बंदी होती. परंतु नाईलाजास्तव त्यांना सभा भरविण्यास परवानगी देण्यात आली. त्याप्रमाणे १३ तारखेला भाजी मार्केटजवळ प्रचंड मोठी सभा झाली व त्या सभेत स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल जागृती करणारी भाषणे करण्यात आली.
१४ ऑगस्ट रोजी दांडेपाडा येथे देखील एक प्रचंड सभा होऊन तशीच भाषणे करण्यात आली. सरकारी अधिकाऱ्यांपुढे मोठाच पेच निर्माण झाला. त्यांनी लोकांची समजूत काढण्यासाठी सभेला परवानगी दिली होती. त्या ऐवजी स्वयंसेवकांनी त्या सभांचा उपयोग लोकक्षोभासाठीच केला. सभा संपल्यावर लोकांचा एक समुदाय समुद्रमार्गे के. डी. हायस्कूलच्या समोर आला. तेथे काही पोलीस होते. सभेतील भाषणांच्या परिणामामुळे पोलीसांना पाहताच या स्वयंसेवकांना चेव चढला व त्यांनी पोलिसांच्या आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातून संघर्ष सुरू झाला. एवढे निमित्त मिळताच पोलीसांनी जमावावर बेदरकारपणे अमानुष गोळीबार केला. त्यात श्री. रामकृष्ण वासुदेव करवीर व श्री. चिंतामण लक्ष्मण बारी यांना हौतात्म्य प्राप्त झाले व श्री. नारायण वासुदेव सावे, श्री. अहमदमिया हसन इब्राहिम व श्री. हरिभाऊ पवार वगैरे नऊ जण जखमी झाले.
चिंचणीतील चळवळ आणि एकंदर वातावरण पाहून सरकारने चळवळ चिरडण्यासाठी शिंदे नावाच्या एका फौजदाराची नेमणूक केली होती. हा माणूस एक उलट्या काळजाचा हडेलहप्पी व क्रूर अधि वंदन.... जय हिंद