सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी हितवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘बिझनेस कॉन्क्लेव्ह (उद्योजक शिबिर)’ उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. माहीममधील ४५ हून अधिक उद्योजकांनी या कॉन्क्लेव्हमध्ये सहभाग नोंदविला. उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धी, परस्पर नेटवर्किंग, शासकीय योजनांची माहिती आणि नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष तुषार राऊत यांनी प्रास्ताविकातून कॉन्क्लेव्हच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपस्थित उद्योजकांनी आपल्या व्यवसायाचा संक्षिप्त परिचय देत परस्पर संवाद साधला. मार्गदर्शन सत्रात सौ. दीपा राऊत यांनी उद्योजकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, आर्थिक सहाय्य, अनुदानाच्या संधी तसेच विविध शासकीय पोर्टलचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. निनाद सावे यांनी आधुनिक व्यवसायातील संधी, प्रभावी नेटवर्किंग, डिजिटल माध्यमांचा वापर, ब्रँडिंग आणि व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक धोरणांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या मुक्त चर्चा व प्रश्नोत्तर सत्रात उद्योजकांनी विविध विषयांवर आपले प्रश्न मांडले. तज्ज्ञांनी त्यांचे समाधानकारक निरसन करत व्यवसायविकासासाठी उपयुक्त सूचना दिल्या. समारोपप्रसंगी मंडळाचे विश्वस्त अरुण पाटील यांनी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत आयोजक, मार्गदर्शक आणि उपस्थित उद्योजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष आदित्य पाटील, कार्यवाह चैतन्य वर्तक यांनी विशेष परिश्रम घेतले. नोंदणी कक्षाचे नियोजन अर्चित आणि सौरभ यांनी अत्यंत सुरळीतपणे सांभाळले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय राऊत आणि प्रशांत चुरी यांनी प्रभावीपणे केले. ज्ञान, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि नव्या व्यावसायिक संधींची दिशा देणारा हा बिझनेस कॉन्क्लेव्ह सर्वार्थाने यशस्वी ठरला. सहभागी उद्योजकांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.