महिला दिन साजरा करु हे निमित्त साधून आम्ही दहिसर येथील एकवीरा महिला मंडळ दहिसरच्या भगिनींनी सहलीला जायचे ठरवले. मी आणि माझ्या बरोबर उपाध्यक्ष सौ. निमा सावे आणि खजिनदार सौ. शितल पाटील असे आम्ही सहलीची तयारी केली. सतरा मार्चची सकाळ अगदी सकारात्मक उर्जेनी भरली होती. आम्ही सव्वीस जणी जणार होतो पण काही कारणास्तव चार जणींना रद्द करावे लागले. गणपती बाप्पा मोरया असे म्हणत आमची बस दहिसर वरुन सुटली. एका तासाचाच प्रवास होता. गाण्याच्या भेंड्या, एकेकीची नावे घेऊन गाणी आणि सुंदर भजने यांनी बस अगदी दुमदुमून गेली. सहलीच्या ठिकाणी गेल्यावर देखिल पाण्यात पोहणे, संगीत खुर्ची, डोंगराला आग लागली असे अनेक खेळ खेळलो. गंमत म्हणून पुन्हा विद्यार्थी होण्याचे आम्ही ठरवले. परीक्षा देणे, त्या विचाराने मनात धस होणे अन् बाजूच्या पेपर मधे हळूच डोकावणे. हे सारे जणू विसरूनच गेलो होतो. म्हणूनच आम्ही सामान्य ज्ञान चे पेपर्स तयार केले होते. सौ. कल्पिता वर्तक हिने पेपर काढला. ज्या कोरोनाला आपण इतके घाबरलो होतो तिच्या लसीचे नाव लिहायचं होतं पेपर मध्ये. आठवेच ना... आम्ही बायका साडी दिसताच तिचे नाव पटकन सांगतो अन् रंगाचे नाव तर असे असते की पुरुषांना शोधून सापडणार नाही तो रंग. चित्रकलेच्या स्पर्धेचे देखिल आयोजन केले होते. परिक्षक सौ. मिनल सावे यांनी विषय दिला उगवता किंवा मावळता सूर्य. उगवता किंवा मावळता सूर्य हा विषय. क्षणभर मनात आले महिलांच्या आयुष्यात सुट्टी हा सूर्यच देऊ शकतो.एक दिवस तो रजेवर गेला तर दिवस उजडणारच नाही. किती मज्जा येईल ना! असा स्वतःसाठी दिलेला एक दिवस एकिमेकिंची मस्ती करत साजरा झाला. खुप जास्त ऊर्जा घेऊन आम्ही परत घरी निघालो. निघताना कोणीतरी म्हणाले मावळतीचा सूर्य किती छान दिसतो आहे... खरंच हेच तर जीवन आहे. आम्ही महिला सकाळी जशा निघाल्या होत्या तशाच सुंदर आणि आनंदी घरी परतल्या. अगदी त्या सूर्याप्रमाणे.... सौ.विद्या प्रशांत सावे अध्यक्षा, एकवीरा महिला मंडळ